आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश भुसावळातील भूमिगत गटारी, सांडपाणी व्यवस्थापनाच्या 401 कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी –


भुसावळ : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात भूमिगत गटारी, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून 401 कोटी रुपयांचा तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव मध्यवर्ती नियोजन व संकल्पचित्र व सनियंत्रण विभागाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. यामुळे आगामी काळात शहरातील सर्व गटारी बंदीस्त होतील तर शहरातून निघणार्‍या सांडपाण्यामुळे होणार्‍या तापी नदीच्या प्रदूषणावर आळा बसणार आहे.

401 कोटींचा प्रस्ताव
भुसावळ शहरात सांडपाणी व्यवस्थापनासाठी खुल्या गटारी आहेत. शहर जिल्हा निर्मितीच्या उंबरठ्यावर असतानाही गेल्या काळात उपाययोजना झाली नाही. यामुळे आमदार संजय सावकारे यांनी प्रयत्न केले होते. यासाठी गेल्या काळात एमजीपीच्या मध्यवर्ती नियोजन व संकल्पचित्र व सनियंत्रण विभागाकडे 401 कोटींच्या प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाबाबत आमदार सावकारे यांनी पाठपुरावा करीत त्याला तांंत्रिक मंजुरी मिळवली आहे. यामुळे आता आगामी काळात पुढील प्रक्रिया होऊन शहरातील सर्व भागांमध्ये भुयारी गटारी होती. सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या यंत्रणेचीही उभारणी होणार असल्याने नाल्यांमधून सांडपाणी थेट तापी नदीत मिसळून नदीचे होणारे प्रदूषणही थांबेल. भूमिगत वाहिनीसाठी दरडोई 135 लीटर पाणीपुरवठा होण्याचे निकष आहेत. आगामी काळात अमृत योजनेतून हे निकष पूर्ण होणार असल्याने भूमिगत गटारीची आवश्यकता होती.

अल्पावधीत मंजूरी मिळवली : आमदार
पालिकेला सूचना देवून या यंत्रणेचा डीपीआर तयार करुन तो जुलै महिन्याच्या अखेरीस तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला होता. यावर कमी वेळात मंजूरी मिळवली आहे. आगामी काळात पुढील प्रक्रिया होऊन या कामाला गती देण्यासाठी निरंतर पाठपुरावा केला जाणार आहे. शहरात हे सर्वांत महत्वाचे काम आगामी काळात पूर्ण होईलख, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.