भुसावळ – दीपनगर औष्णिक केंद्रातील 500 मेगावॅट संचांच्या टिपलरला शनिवार, 9 रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान आग लागली. आगीनंतर दीपनगरातील 500 बाय 2 संचांतून वीज निर्मितीचे प्रमाण रविवारी निम्याने कमी झाले. एक हजार 210 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून केवळ 600 मेगावॅट विजेची निर्मिती झाली. दरम्यान प्रशासनाने टिपलर दुरुस्तीसोबतच 210 मेगावॅट केंद्रातून कन्हेअर बेल्टव्दारे कोळसा आणण्याचे नियोजन केले आहे.

मात्र ते पूर्ण झाले नसल्याने निर्मितीमध्ये घट झाली आहे. दीपनगर औष्णिक केंद्रात टिपलर क्रमांक तीनला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही तर या आगीत सुमारे 60 लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे समजते. टिपलरला लागलेल्या आगीचे ठोस कारण शोधण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाणार आहे. समितीच्या माध्यमातून शोध घेवून अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी दिली. आगीच्या घटनेमुळे वीज निर्मितीवर कोणताही परिणाम होणार नाही. दोन टिपलरसोबतच 210 केंद्रातूनही कोळसा कन्हेअर बेल्टव्दारे कोलमिलपर्यंत पोहचणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र रविवारी दुपारी केंद्रातून निम्मेपेक्षा कमी अर्थात 600 मेगावॅट विजेची निर्मिती झाली. दरम्यान टिपलरच्या डक्टच्या दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार आहे.


