जळगाव : ग्रामपंचायत सदस्याची अपात्रता टळण्यासाठी सकारात्मक अहवाल देण्यासाठी तडजोडीअंती 20 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोघा लिपिकांना जळगाव एसीबीने अटक केली. महेश रमेशराव वानखेडे (नेर, ता.यवतमाळ) व समाधान लोटन पवार (35, लालबाग कॉलनी, पारोळा) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.
रायपूर येथील ग्रामपंचायत सदस्य हे तक्रारदार असून 2021 मध्ये ते निवडून आले. त्यानंतर तक्रारदार यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात रायपूर गावातील गैरअर्जदार यांनी तीन अपत्याबाबत यांनी तक्रारी अर्ज केला होता. हे प्रकरण हे ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील महेश वानखेडे यांच्याकडे प्रलंबित होते. त्यानंतर तक्रारदार हे वानखेडे यांना भेटल्यानंतर त्यांना सांगितले की, तुमचा तीन अपत्याबाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून देवून जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही मात्र त्यासाठी 30 हजारांची लाच लागेल. तक्रारदार यांनी शनिवार, 9 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचांसमक्ष पडताळणी केली असता वानखेडे यांनी पंचांसमक्ष लाचेची मागणी केली व शनिवारी वानखेडे यांनी सांगितल्यावरून पवार यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 20 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक
एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी यांनी सापळा यशस्वी केला तर पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकुर, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.



