भुसावळला कर्मचाऱ्यांनी पुकारला संप, पालिकेने यशस्वी चर्चा करताच दोन तासांत माघार, कामकाज पूर्वपदावर

भुसावळ : सातत्याने मागणी, विनंती करूनही पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी बेदखल आहेत. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी १ मे रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी निदर्शने केली. यानंतर सोमवारी सकाळपासून संप पुकारला. मात्र, मुख्याधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. परिणामी दुपारी १२ वाजेनंतर कामकाज पुन्हा पूर्वपदावर आले.

शासन व पालिका प्रशासन संचालनालय स्तरावर पालिका कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी अर्ज, विनंत्या, निवेदने देऊनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने भुसावळ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी निदर्शने केली. यानंतर सोमवारी पालिका कार्यालय आवारात मंडप टाकून काम बंद अांदाेलन सुरू केले. ऐन सणासुदीच्या दिवसांत पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवल्यास अडचणी येण्याची शक्यता पाहता मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत केलेली चर्चा यशस्वी झाली. यानंतर दुपारी १२ वाजेनंतर संप मागे घेतल्याचे पालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी सांगितले.
पाणीपुरवठा सुरळीत….संप चिघळला असता तर पाणीपुरवठा आणि सफाईचा प्रश्न निर्माण झाला असता. मात्र, चर्चा यशस्वी झाल्याने पाणीपुरवठा आता सुरळीत राहील. सफाई कर्मचारी देखील कामावर हजर झाले, असे आराेग्य अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले. मंगळवारी अक्षय तृतीय, रमजान ईद असल्याने पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना सकाळीच विनंती करून कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्या हाेत्या, असे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सतीश देशमुख यांनी सांगितले.