भुसावळ –
दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पात गेल्या सात ते आठ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कामगारांना दीपनगर प्रशासनाने कामावरुन कमी केले. दीपनगर प्रशासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात सोमवार, 14 जूनपासून सकाळी 10 वाजेपासून दीपनगर वीजनिर्मिती केंद्राच्या गेटवर आमरण उपोषण सुरु करणार आहे. त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा या कामगारांनी दिला आहे.

जिल्हाधिकार्यांना निवेदन
यासंदर्भात कामगारांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून, यात नमूद करण्यात आले की, दीपनगर येथील 210 आणि 660 प्रकल्पात कमलाकर मराठे, तेजस जैन, संदीप महाजन, उल्हास पाटील, हर्षल पाटील, शिवा पवार यांच्यासह असंख्य कामगार हे 7 ते 8 वर्षापासून कामाला होते. मात्र दीपनगर प्रशासनाने राजकीय दबावापोटी या तरुणांना कामावरून कमी करून अन्याय केला. गेल्या वर्षभरापासून हे कामगार घरीच असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात कामगारांनी 210 आणि 660 प्रकल्पाच्या मुख्यभियंत्यांची भेट घेत कामावर घेण्याची विनंती केली होती. तरी देखील दीपनगर प्रशासन त्यांना कामावर घेण्याला तयार नाहीत.
राजकीय दबावापोटी कारवाईचा आरोप
कोरोना महामारीच्या काळात कर्मचार्यांना सहानुभूती व मदत तर सोडाच, जे काम हाताला होते. ती पोटची भाकर पळविण्याचे पाप राजकीय दबावापोटी मुख्य अभियंता यांनी केल्याने तरुणांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. निवेदनाच्या प्रती दीपनगर मुख्य अभियंता, राज्यपाल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, महासंचालक वीज निर्मिती मुंबई यांना पाठवण्यात आाल्या आहेत.


