जळगाव –
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने 15 मे, 2021 पर्यंत संपुर्ण राज्यात संचारबंदी लागु केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जळगांव यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 भारतीय साथरोग अधिनियम, 1897 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचार बंदी लागु केली आहे. त्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येतांना पक्षकारांना (नागरीकांना) दस्त नोंदणीसाठी जळगांव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येतांना 48 तासाचे आत आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटीव्ह असेल तर कार्यालयात दस्त नोंदणीसाठी उपस्थित रहावे, असे सुचित करण्यात आले होते. तथापी, सध्याच्या कोविड परीस्थितीचा विचार करता आरटीपीसीआर चाचणी अहवाल उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्याने व आरोग्य विभागावर आधीच असलेला ताण आणखी न वाढविता रॅपिड अॅन्टीजेन चाचणीचा अहवाल ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे सह जिल्हा निबंधक विजय सु. भालेराव (वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव) यांनी कळविले आहे.



