भुसावळ (प्रतिनिधी )-
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी वयाची अट १८ वर्षाची केली आहे तथापि १ मे पूर्वी भाजीपाला, दूध उत्पादक व दुध विक्रेत्यांचे सक्तीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
कोविडचा प्रसार कमी होणार:
राज्यासह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. महाराष्ट्रात पंधरा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व नागरिकांना भाजीपाला व दुधासारख्या शेतीमालाचा सतत व अखंड पुरवठा कायम ठेवण्यात शेतकरी महत्त्वाची भूमिका निभावतात. भाजीपाला आणि दुधाच्या वाहतुकीचे काम करीत असलेल्या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्वरित सर्व भाजीपाला, दूध उत्पादकांना तसेच विक्रेत्यांना जास्त धोका असल्याने यांचे सक्तीने लसीकरण करण्याचे स्थानिक आरोग्य प्रशासनाला आदेश द्यावेत. अशी मागणी पत्रात केली प्रा.पाटील यांनी केली आहे. यामुळे दूध आणि भाज्यांचा चक्रीय पुरवठा थांबणार नाही तसेच या लोकांची आर्थिक स्थिती देखील मंदावणार नाही. शिवाय यामुळे कोविडचा प्रसार सुद्धा या लोकांद्वारे कमी होऊ शकतो असेही त्यांनी पत्रामध्ये म्हंटले आहे.



