मुंबई .-
महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीकेंड लॉकडाऊन केल्यानं प्रथमच राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादामध्ये ते वीकेंड लॉकडाऊनला राज्यातील जनतेने दिलेला प्रतिसाद, राज्यातील कोरोना लसीकरण, रक्तदान, सरकारी आणि खासगी कार्यलयांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु करणे याबाबत संवाद साधण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या संवादामध्ये महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा करु शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत तसेच रविवारी टास्कफोर्स सोबत बैठक घेतली होती. त्याबैठकीत राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा देखील झाली. त्यापूर्वी 8 मार्च त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील संवाद साधला होता. राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याबाबत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं मत तज्ञांनी मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहावे लागणार आहे.
महाराष्ट्रात 12-13 दिवसांचा लॉकडाऊन?
महाराष्ट्रात लॉकडाऊन 12 ते 13 दिवसांचा असू शकतो, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यातल्या परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका. तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याचं आश्वासन देतो, असं मुश्रीफ म्हणाले होते.



