मुंबई : दिवाळीची सुटी आता पाच ऐवजी १४ दिवसांची करण्यात आली असून त्याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्णय घेत शासन परीपत्रकात बदल केल्याने विद्यार्थी व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरूवातीला १२ ते १६ नोव्हेंबरदरम्यान सुटी जाहीर करण्यात आली होती मात्र आता परीपत्रकात बदल करून १४ दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. ७ नोव्हेंबरपासून ही सुटी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ते सुरू होते. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने १२ ते १६ नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवसच ऑनलाईन वर्गाला सुट्टी जाहीर केल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.



