मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या — आमदार अमोल जावळे यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील मयत शेतकरी कर्जदारांच्या वारसांना शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी प्रणाली सुरू होण्यापूर्वी कर्ज घेतले होते. त्यानंतर त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या वारसांकडे फार्मर आयडी नसल्यामुळे कर्जमाफीचा लाभ नाकारला जात आहे. ही केवळ तांत्रिक अडचण असून आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर मयत शेतकरी कर्जदारांच्या वारसांसाठी फार्मर आयडीची अट शिथिल अथवा पूर्णपणे रद्द करून आवश्यक कागदपत्रांच्या आधारे कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आमदार जावळे यांनी केली आहे.