रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने संतापात घर सोडून निघालेल्या अल्पवयींन बहिणींना कुटूंबियांना सोपवले –

भुसावळ (प्रतिनिधी) : घरातील वादामुळे मुंबईतील मीरा भाईंदर येथील एकाच घरातील दोन्ही अल्पवयीन बहिणी दिल्लीकडे जाणार्‍या पंजाबमेलमधून शुक्रवार, 8 रोजी सकाळी जात असतांना चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान गाडीतील गस्त करणार्‍या आरपीएफच्या पथकाला मुलींच्या हालचाली संशयास्पद वाटताच त्यांची चौकशी करण्यात आली. दोघे मुली घरून संतापात निघालेल्या असल्याची माहिती त्यांनी देताच त्यांना भुसावळ आरपीएफकडे सोपवण्यात आले.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ऑपरेशन नन्हें फरिस्ते अंतर्गत दोन अल्पवयीन मुलींना रेल्वे सुरक्षित ताब्यात घेऊन आधार बहुउद्देशीय संस्था समिती, जळगावकडे सुपूर्द करण्यात आले.

रेल्वे सुरक्षा बलास मुंबई येथून मिळालेल्या माहितीप्रमाणे, दिल्लीकडे जात असलेल्या कुठल्या तरी रेल्वे गाडीत दोन अल्पवयीन मुली या दोन्ही बहिणी असून त्या रेल्वेने जात आहे. याच पार्श्वभुमीवर पंजाब मेल (गाडी क्र. 12137 डाउन) मध्ये एस-1 या डब्यात दोन अल्पवयीन मुली मुंबईहून दिल्लीच्या दिशेने घरात रागविल्यामुळे नाराज होऊन जात होत्या, गाड्यांची तपासणी केली जात असतांना पंजाम मेलमधून प्रवास करत असल्याचे समजताच निरीक्षक पी.आर. मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टी.पी.मीना, एस्कॉर्टिंग पथक (गस्त) स्टेशन व गाडीतील तिकीट तपासणी पथकाने तातडीने शोध मोहिम राबवली.
चाळीसगाव-भुसावळ दरम्यान या मुली एस्कॉर्ट पथकाला एस-1 या डब्यात दिसताच, गाडी भुसावळ स्थानकात येताच त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. महिला आरक्षक हेमलता चोपडे यांच्या देखरेखीखाली, तसेच सीसीटीव्ही निगराणीमध्ये, दोघींना आरपीएफ ठाण्यात ठेवण्यात आले. संस्थेच्या सदस्य दीपाली सुनील हिवाळे यांच्या उपस्थितीत चौकशीत दोघींनी आपली नावे प्राची (16) व खुशी (15) (रा. मीरा-भाईंदर मुंबई), असे सांगितले.

कुटूंबातील नाराजीने सोडले घर

दोन्ही जणी या घरातील नाराजगीमुळे मुंबईहून दिल्लीला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही मुलींना जळगाव येथील आधार बहुउद्देशीय संस्था समितीकडे सोपविले. आरपीएफच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुली मिळाल्यात. याप्रकरणी मुंबई पोलिसांना याची माहिती दिल्यावर मुलींना घेण्यासाठी मुंबईतून पथक भुसावळकडे निघाले.