भुसावळ (प्रतिनिधी )-
जिल्हाधिकारी डाॅ.अविनाश फाकणे यांनी दिलेल्या आदेशाला अधीन राहून, परवानाधारक घाऊक व्यापारी व आडतदारांच्या माध्यमातून दि.२१ एप्रिल मंगळवार पासून स्थानिक टिंबर मार्केट मधील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव होणार आहेत.यामुळे तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकर्यांची लूट थांबून त्यांचा खर्च कमी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील भाजीपाला लिलाव बंद करण्यात आले आहेत. यामुळे व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता कृषी उत्पन्न बाजार समितीने आता जिल्हाधिकार्यांनी १४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार, घाऊक परवानाधारक व्यापारी व अडतदार यांना घाऊक व्यापाराचे परवाने दिले होते. सोशल डिस्टन्सिंग ठेवत केवळ २० व्यापार्यांना बाजार समितीमध्ये सोडण्यात येईल. यासोबतच आतील भागात आखणी करण्यात आली आहे. स्वच्छता करून पथदिवे लावले आहेत. बाजार समितीच्या लिलाव पध्दतीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्यांचा फायदा होईल. त्यांचा लिलावासाठी होणारा खर्च वाचेल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी व सचिव नितीन पाटील यांनी दिली.



