जळगाव,

तुम्हीही भर दुपारी उन्हात जात असाल तर ही बातमी नक्की वाचा. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड ऊन पडत असले तरी आता आणखी सूर्याचा पारा वाढणार आहे. जळगाव जिल्हाभरात आजपासून तापमान झपाट्याने वाढणार असून दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असताना तापमानाचा पारा ४४ अंशांवर जाण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. त्यामुळे २० ते २२ या तीन दिवसांत जळगावकरांना उन्हाचा भयंकर तडाखा सहन करावा लागणार आहे.
शनिवारी तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. रविवारपासून पुढच्या तीन दिवसांत तापमानाचा पारा ४४ अंशांवर जाईल, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. त्यासोबतच निरभ्र आकाश असणार आहे. त्यामुळे उन्हाची दाहकता असह्य करणारी ठरणार आहे.
यंदा मार्च महिन्यापासूनच अनेक भागांत तापमान वाढले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. त्यात आणखी भर पडणार असल्याने जळगावकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे.
अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात घराबाहेत पडताना भरपूर पाणी प्या. दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्या. हलके आणि सैलसर कपडे परिधान करा. उष्ण हवामानात सुती कपडे घाला. थेट उन्हापासून बचाव करा. शक्यतो ११ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळा. शारीरिक श्रम कमी करा, प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळा. योग्य आहार, फळांचे रस, नारळपाणी, ताक यांचा समावेश आहारात करा. तसेच अधिकाधिक पाणी पिऊन शरीरातील पाणीपातळी संतुलित ठेवावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
<1>
This is the last page


