भुसावळ – हिरोला झिरो व झिरोला हिरो करणार्या ईव्हीएम मशीनचा निषेध करीत त्याची अंत्ययात्रा शहरातील संविधान आर्मी संघटनेतर्फे कामगार नेते जगन सोनवणे यांनी जुन्या पालिका कार्यालयासमोरून काढली. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले व या निकालामागे ईव्हीएमच कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी सोनवणे यांनी केला.
संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध 10 संघटनांच्या वतीने शुक्रवारी चार खांदेकर्यांनी तिरडीवर प्रतीकात्मक ईव्हीएम ठेवून त्याची अंत्ययात्रा काढली. अग्रभागी डफ वाजवण्यात आला व काही अंतरावर ईव्हीएमची होळी करण्यात आली. यावेळी परभणी येथील संविधानाची विटंबना करणार्या संविधानद्रोहीची जाहीर होळी करण्यात आली.

यावेळी ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते जगन सोनवणे यांनी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धवजी ठाकरे तसेच यापूर्वी वामन मेश्राम यांनी ईव्हीएम हटाव विरोधात चळवळ उभारली होती ती योग्यच असल्याचे ते म्हणाले. ईव्हीएम हटत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही निवडणूक लढविणार नाही व जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
ऑल इंडिया संविधान आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राकेश बग्गन, ऑल इंडिया संविधान आर्मीचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल इंगोले (यवतमाळ), भुसावळ शहराध्यक्ष मोहम्मद जावेदख ग्रामपंचायत सदस्य सुनील ठाकूर, गजानन चराटे, गौरव इंगळे, प्रदीप सुरडकर, शुभम सोनवणे, निलेश सोनवणे आदींचा आंदोलनात सहभाग होता.


