भुसावळ दीपनगर प्रकल्पातील राखेची वाहतूक करणारे बल्कर हे चालकांकडून सर्विस रस्त्यावर मनमानी पद्धत्तीने उभे केले जात असल्याने दीपनगरसह तीन गावांच्या नागरिकांनी एकत्र येत शुक्रवारी सायंकाळी सुमारे 25 वर बल्कर रोखून धरल्याने खळबळ उडाली. भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक ठाम राहिले. दरम्यान, आरटीओ प्रशासनासह स्थानिक पोलिसांवकडून कारवाई होत नसल्याने बल्कर चालकांची हिंमत वाढल्याने किमान आतातरी धडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे .
दीपनगर प्रकल्पाच्या बाहेर महामार्गावरील सर्व्हीस रोडवर दररोज 25 पेक्षा जास्त राखेचे बल्कर उभे राहत असल्याने अनेकदा अपघात होत असल्याने दीपनगरासह निंभोरा, पिंप्रीसेकम भागातील नागरिकांनी एकत्र प्रकल्पात एकही बल्कर जावू दिला नाही तसेच बाहेरही निघू दिला नाही. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे दीपनगर प्रशासनासह पोलिस वर्तुळात खळबळ उडाली.सर्व्हीस रोडवर एकही बल्कर लावू दिले जाणार नाही, असा पवित्रा गावकर्यांनी घेतला आहे. रात्री नऊ वाजेनंतरही आंदोलन सुरू होते. उपमुख्य अभियंता कुंभार यांनी आंदोलक, चालक, बीटीपीएस ठेकेदार संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली. त्यात त्यांनी शनिवारपासून दोन सुरक्षा रक्षकांकडून रस्त्यावर उभ्या करणार्या वाहनांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.



