भुसावळातील दोन उच्चशिक्षीत तरुणांचा पवना धरणात बुडाल्याने मृत्यू -लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना ः आज तरुणावर अंत्यसंस्कार

भुसावळ ः शहरातील मूळ रहिवासी व हल्ली पुण्याजवळील बालेवाडीतील खाजगी कंपनीत कार्यरत भुसावळातील दोघा उच्च शिक्षीत तरुणांचा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पवना धरणात बुडाल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवार, 4 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचे वृत्त शहरात धडकताच मोठी खळबळ उडाली. मयूर रवींद्र भारसके (25) तर तुषार रवींद्र अहिरे (26, दोघेही सध्या रा.पुणे, मूळ रा.लालजैन मंदिर पाठिमागे, पद्मावती नगर, भुसावळ) अशी मयतांची नावे आहेत.

पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाले
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत सिनियर सेल्स एक्झीकेटीव्ह या पदावर कार्यरत मयूर व तुषार हे दोघे मित्र आपल्या अन्य आठ मित्रांसह पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आल्यानंतर भुसावळातील दोघा मित्रांना दुधीवरे हद्दीतील पवना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाल्यानंतर दुपारी चार वाजता वाजता ते पोहण्यासाठी उतरले. पोहताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.

24 तासांच्या परिश्रमानंतर मृतदेह बाहेर
दोघे मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून मित्रांनी आरडा-ओरड केली तसेच स्थानिकांना माहिती दिली. शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने धरणात बुडालेल्या दोघांना 20 तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात यश आले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मदतकार्यासाठी सरसावली संस्था
तुषार अहिरे हा ज्येष्ठ पत्रकार व अखिल भारतीय सरपंच संघटनेचे राज्य सचिव विवेक ठाकरे यांच्या मावस भावाचा मुलगा असल्याने त्यांनी घटनेची माहिती स्थानिक मावळ तालुका सरपंच परिषदेच्या पदाधिकार्‍यांना दिल्यावर संघटनेचे राज्य संघटक सचिन जगताप यांनी मदतकार्यासाठी सूत्रे हलवली. शिवदुर्ग संस्थेच्या जलतरणपटूनी बहुत प्रयत्नांती तब्बल 20 तासांच्या परिश्रमानंतर दोघं तरुणांचे मृतदेह शोधून काढले. लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन अग्रवाल यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने विना मोबदला थेट खंडाळा (पुणे) येथून भुसावळ येथे मृतदेह पोहच करण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून दिल्याने दोघा मृत युवकांच्या नातेवाईकांना आधार मिळाला.

आधी हरवले पितृछत्र, नंतर आजोबा व आता काळाचा मुलावरही घाला
धरणात बुडालेल्या तुषार (सोनू) अहिरे याचे वडील रवींद्र अहिरे यांचे गेल्या मार्च महिन्यात निधन झाले तर आजोबा प्रकाश देवराम अहिरे यांचे गत नोव्हेंबर महिन्यात 13 रोजी निधन झाले. या दुःखाःतून परिवार सावरत नहाी तोच घरातील कर्त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटूंबावर मोठार आघात झाला आहे. अहिरे परिवार मूळ खडकदेवळा, ता.पाचोरा येथील रहिवासी असून रेल्वे नोकरीनिमित्त भुसावळात स्थायीक आहे.

मयत तरुणावर आज अंत्यसंस्कार
पवना धरणात बुडून मरण पावलेल्या तुषार अहिरे या तरुणाची अंत्ययात्रा शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता भुसावळ येथील लाल जैन मंदिर, पद्मावती नगर, भुसावळ येथील राहत्या घरापासून निघणार आहे.