भुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्णत्वाकडे आली असून मतदारसंघातील ३१६ मतदान केंद्रावर दोन लाख ९९ हजार मतदारांसाठी म्हैसूर येथून ३४४ बोटावर लावण्याच्या शाईच्या बाटल्या येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेद्र पाटील, अंगद आसटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदे प्रांताधिकारी पाटील म्हणाले की, मतदानाची तारीख जवळ आली आहे. निवडणूक यंत्रणेकडून ९० टक्के कामे पूर्ण झाली आहे. प्रांताधिकारी जितेद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. बीएलओ, सेक्टर अधिकारी यांची मिटींग घेण्यात आली. त्यांना निवडणूकीच्या कामाबाबात सूचना देऊन त्यांच्या कामाचा आढावा घेतला. आचारसंंहिता लागल्यावर सर्व शासकीय वाहने, निमशासकीय वाहने जमा केली आहे.
मतदान साहित्य व कर्मचारी यांना ने-आण करण्यासाठी १९ बस, ९६ ट्रॅक्स, सुमो, क्रुझर वाहने असतील, 36 वाहने ही सेक्टर अधिकार्यांसाठी, तीन भरारी पथकासाठी चार स्थिर सर्व्हेक्षण पथकासाठी वाहने असतील. निवडणूकीचे साहित्य वितरण आणि स्विकारण्याचे काम हे तहसील कार्यालयातून होणार आहे. तेथून रात्री मतदान यंत्रे ही जळगावात रवाना होतील.
भुसावळ मतदारसंघात 316 मतदान केंद्रांपैकी 11 मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्रे असतील. तीन मतदान केंद्रे ही महिला अधिकारी, कर्मचारी हेच चालविणार आहे. यात कोटेचा महाविद्यालय, एन.के.नारखेडे शाळा पत्री शाळा व गोजोरे येथील जिल्हा परिषदेची शाळा येथे महिलाराज राहणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी पु.ग.बर्हाटे व पालिकेची शाळा नंबर ३५ ही स्वतंत्र केंद्रे असतील तर ३५ वयोगटाच्या आतील अधिकारी असलेले युवा मतदान केंद्र म्हणून के. नारखेडे विद्यालय असेल. ग्रामीण भागात भानखेडा जिल्हा परिषद शाळा, जाडगाव, टहाकळी, किन्ही व आदर्श हायस्कूल भुसावळ हे आदर्श आहे.
एकूण मतदान केंद्र ३१६, एकूण मतदार दोन लाख ९९ हजार, पुरूष मतदार एक लाख ५४ हजार तर महिला मतदार या एक लाख ४५ हजार असतील. ज्येष्ठ मतदार ८० वयापेक्षा जास्त तीन हजार २२८, तृतीय पंथी मतदारांची संख्या ही ३७ आहे. १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ही तीन हजार इतकी आहे तर दिव्यांग मतदारांची दोन हजार ४१२ आहे. एकूण कर्मचारी दोन हजार २२० आहे. यात पुरूष कर्मचारी एक हजार ५४० तर महिला कर्मचारी ६४७ इतक्या आहे. एका शाळेवर एक आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली आहे. एनसीसी व एमसीसीचे स्वयंसेवक असतील. सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा असणार असल्याने वाहनांची स्थिती कार्यालयात कळणार आहे.



