भुसावळात पालिकेतर्फे अचानक अतिक्रमण हटाव मोहिम : व्यावसायीकांची उडाली धांदल :

भुसावळ : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याने बुधवारी पालिका प्रशासनाने प्रशासकांच्या उपस्थितीत अचानक बुधवारी सकाळी 11 वाजता यावल रोडपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करताच व्यावसायीकांमध्ये प्रचंड खळबळ उडून धांदल निर्माण झाली. पालिकेने जेसीबी, ट्रॅक्टर व पालिका कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत धडक मोहिम सुरू केली असून जळगाव रोडवरील तहसील कार्यालय ते गांधी पुतळा, यावल रोड ते साईजीवन सुपर शॉप तसेच न्यायालयामागील भागातील अतिक्रमण दुकानांवर जेसीबी फिरवण्यास सुरूवात केली आहे.
पालिकेच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वीच कारवाई करण्यात आली होती मात्र पुढचे पाढे पंचावन्न प्रमाणे व्यावसायीकांनी पुन्हा दुकाने रस्त्यावर थाटली. बुधवार, 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता प्रशासक जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत अचानक पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. यावल रोडवरील आरपीडी रोडवरील काही टपर्‍यांवर जेसीबी फिरवण्यात आल्याने व्यावसायीक पुरते हादरले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या व टपर्‍या उभ्या करण्यात आल्याने हे अतिक्रमण हटवून रस्ते अतिक्रमणमुक्त केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील हातगाड्या, टपर्‍या काढण्यासाठी बुधवारपासून मोहिम सुरू करण्यात आली. शहरातील सर्वच भाग अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहे. अतिक्रमण करणार्‍या व्यावसायीकांनी कारवाईपूर्वीच अतिक्रमण हटवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष करून शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर लावण्यात आलेल्या खाद्य पदार्थार्ंच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याची होत आहे.