- राज्यात तापमानाचा पारा वाढत असून उन्हाचा चटका जाणवत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला असून उर्वरित ठिकाणी उष्ण दमट हवामान असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील ५ दिवस घराबाहेर पडणं टाळा असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. आज मुंबई, पुणे, कोकणात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ५ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० शी पार करण्याची शक्यता आहे. काल अकोल्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस इतका होता. अकोला जिल्हा राज्यातील सर्वाधिक उच्चांकी तापमान असणारं शहर ठरलं आहे. आज अकोल्यातील तापमान ४२ अंशावर गेलं आहे.

आज मुंबई, पुणे, ठाणे, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सूर्य आग ओकत असून तापमानात वाढ झाली आहे. नांदेडमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस इतके आहे, नाशिकमध्ये ४१ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान ४२ अंशावर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसात तपमान वाढणार असून विदर्भातील जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील ५ दिवस विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, आणि उन्हापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्या असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
नांदेड जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून मोठया प्रमाणात उष्णतेत वाढ झाल्याने या वाढत्या उष्णतेचा फटका केळी बागांना बसत आहे. केळीच्या बागा करपून जात आहेत. अर्धापुर, मुदखेड नांदेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. तापमान ४० अंशापर्यंत पोहचल्याने केळी बागांना या वाढत्या उष्णतेचा मोठा फटका बसत आहे.परिणामी पाण्याची पातळी देखील खालावली असल्याने केळीला पाणी कमी पडत आहे.त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याच चित्र पहायला मिळत आहे.


