दिपनगर वीज निर्मिती प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा; छोट्या व्यावसायिकांना ५० टक्के टन राख दरमहा द्यावी :शिवसेनेतर्फे अभियंत्यांना निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास “रास्ता रोको” आंदोलनाचा इशारा :

-शिवसेनेतर्फे विविध मागण्यांचे मुख्य अभियंत्यांना दिले निवेदन; आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास “रास्ता रोको” आंदोलनाचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी ) – दीपनगर वीज निर्मिती प्रकल्प बाधित
क्षेत्रातील सुशिक्षित तरुण स्थानिकांना रोजगार द्यावा, न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्के टन राख परिसरातील छोट्या व्यावसायिकांना शासन दरानुसार मिळावी तसेच राखेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. मोठ मोठे बलकर महामार्गावर लावल्यामुळे अपघात होतात. अशा विविध मागण्यांचे निवेदन आज मंगळवार दि. २४ रोजी दीपनगरचे मुख्य अभियंता राजेश मोराडे यांना शिवसेनेतर्फे देण्यात आले. आठ दिवसात वरील मागण्या मान्य न झाल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.

शिवसेनेतर्फे मुख्य अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्प बाधित क्षेत्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार द्यावा, तसेच छोट्या स्थानिक व्यावसायिकांना ५० टक्के टन राख दरमहा देण्यात यावी. परंतु असे न होता बलाढय बाहेरचे मोठे ठेकेदार त्यांचा आपल्या परिसराशी सबंध नसताना राखेचे टेंडर (निविदा) देतात. आणि स्थानिकांना बेरोजगार करतात यामध्ये दीपनगर मधील अधिकाऱ्यांचे ठेकेदार यांच्याशी अर्थपूर्ण संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रकल्प बाधित क्षेत्रातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दिपनगर येथे रोजगार मिळत नसल्याने वेल्हाळे बंधातील राख होण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केली आहे. परंतु बाहेरच्या मोठ्या ठेकेदाराला राखेच ठेका मिळाल्याने स्थानिक तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे.

काही मोठे ठेकेदार फक्त राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या फोनवरून ठराविक समाजातील मुलांनाच दीपनगर येथे कामावर घेत असतात आणि दुसऱ्या समाजाच्या बेरोजगार मुलांना कामावर घेत नाही. अशा जातीभेद करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.

महामार्गावर राखेचे मोठे बलकर क्षमतेपेक्षा जास्त दुप्पट भरून काळाबाजार केला जात आहे. महामार्गावर रस्त्यांमध्ये मोठमोठे बल्कर उभे करून वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होऊन अपघात होतात. तसेच उडणाऱ्या राखमुळे महामार्गावरून जाणाऱ्या मोटरसायकल चालविणाऱ्याच्या डोळ्यात राख जाऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रकल्प बाधित परिसरातील स्थानिक छोटे व्यवसायिकांना धर्म हा 50% टन राख उपलब्ध करून द्यावी, दीपनगर प्रशासनाने बाहेरच्या ठेकेदाराचा राखेचा ठेका त्वरित रद्द करण्यात यावा, ठेकेदारांनी सर्व समाजातील बेरोजगार तरुण यांना कामावर घ्यावे, वरील सर्व मागण्या संदर्भात येत्या आठ दिवसात कार्यवाही नाही झाल्यास शिवसेनेतर्फे दिवसात 660 प्रकल्पासमोरील महामार्गावर महामार्ग थांबून शिवसेना स्टाईलने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, याप्रसंगी होणाऱ्या परिणामास दीपनगर प्रशासन जबाबदार राहील, असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देताना जेष्ठ शिवसैनिक उप जिल्हाप्रमुख विलास मुळे, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, भुसावळ अल्पसंखांक विभाग तालुकाप्रमुख पप्पू जकातदार हे उपस्थित राहून यांनी निवेदन दिले.