दर्यापूर शिवारात दोन घरफोड्या : साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ;

भुसावळ (सा वा) –
वरणगाव फॅक्टरीलगतच्या दर्यापूर शिवारातील सुशिलनगर भागात चोरट्यांनी दोन बंद घरे फोडत तब्बल ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फॅक्टरी परिसरात खासगी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहिली घटना : सिद्धार्थ थाटे यांच्या घरावर धाड

सिद्धार्थ अशोक थाटे हे काही कामानिमित्त बाहेरगावी असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. घरातील २ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

दुसरी घटना : आदिनाथ पाटील यांच्या घरात घरफोडी

दर्यापूर शिवारातील पोस्ट ऑफिस समोरील भागात राहणारे आदिनाथ पुना पाटील हे रात्रीच्या पाळीवर ड्युटीसाठी गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले. चोरट्यांनी १ लाख ७ हजारांचा ऐवज, त्यात १२ हजार रुपये रोख, असा माल चोरून नेला.

तपासासाठी श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत

चोरीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक व फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने तपासाला वेग देण्यात आला आहे. दोन्ही घरमालकांच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

फॅक्टरीच्या चारही बाजूंना खासगी सुरक्षा यंत्रणा तैनात असतानाही दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. हतनुर धरण मार्ग, पोस्ट ऑफिस मार्ग, साईबाबा मंदिर मार्ग या महत्त्वाच्या मार्गांवरही सुरक्षा असतानाही घडलेल्या चोरीमुळे सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या आहेत.

बिबट्याच्या दहशतीनंतर आता चोरट्यांची दहशत

अलीकडेच या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यात आता चोरीच्या घटनांनी अधिकच असुरक्षितता निर्माण झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी पोलीस तपासास सहकार्य केले असून, नागरिकांनीही घाबरून न जाता पोलिसांना योग्य माहिती देऊन मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.