विज्ञान मेळाव्यात जिल्हास्तरासाठी मनीष माळी यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
शहरातील दादासाहेब रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय, वरणगावचा विद्यार्थी मनीष मधुकर माळी याची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.

इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आयोजित होणाऱ्या या मेळाव्यात क्वांटमची सुरुवात : संभाव्यता व आव्हाने या विषयावर तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत मनीष माळीने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ येथील वरद भगत फेगडे याला मिळाला, तर तृतीय क्रमांक दादासाहेब रामदास गणपत झांबरे विद्यालयातील साक्षी अनिल हिवरकर हिने पटकावला. विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शालेय पोषण आहार अधीक्षक बी. डी. धाडी, विद्यालयाचे मुख्याध्यापक नवल महाजन, पर्यवेक्षक हेमंत चौधरी, विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे, विषयतज्ञ शिक्षक संजय गायकवाड, नीलिमा पाटील, प्रशांत वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण सावदा आ.ग हायस्कूलचे सचिन नागपुरे व प. क. कोटेचा महाविद्यालयाचे संजय गावंडे यांनी केले.

यावेळी किशोर वायकोळे म्हणाले की, क्वांटम या विषयामुळे जगामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहेत. औषधनिर्मिती, यंत्रसामग्री यासह विविध क्षेत्रांत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी या शाखेचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

बी. डी. धाडी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, चालू शैक्षणिक वर्ष क्वांटम इयर’ घोषित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी विज्ञान मेळाव्याचा विषय ठरवण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री सरोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन कविता पाटील यांनी मानले.