राज्यातील सर्पमित्रांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. कारण राज्यातील सर्पमित्रांना आता 10 लाखांचा अपघात विमा देण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात शिफारस केली आहे. इतकंच नाहीतर सर्पमित्रांना आता फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी सुरू केली आहे. यासोबतच राज्य सरकारकडून सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रही देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी, विशेषतः सापांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता 10 लाखांचा अपघात विमा देण्यात येणार असल्याने राज्यातील सर्पमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कित्येकदा सर्पमित्र अत्यंत जोखमीचे काम करत असतात आणि अनेकदा साप पकडताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कामाला प्रोत्साहन मिळणार असून आणि त्यांना सुरक्षितपणे काम करण्यास मदत देखील होणार आहे.


