जालन्यात किरकोळ वादातून आठ वर्षाच्या मुलाची हत्या ;

जालना – जालन्यात किरकोळ वादातून निवासी आश्रम शाळेतील आठ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली. धक्कादायक 1बाब म्हणजे मुलांच्या वसतिगृहात राहणार्‍या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. दोन विधी संघर्ष बालक भोकरदन पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर, ही आश्रमशाळा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे.
जालना जिल्ह्यात भोकरदन येथील गणपती विद्यालय निवासी आश्रम शाळेच्या वसतिगृहामध्ये किरकोळ वादातून एका आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा दोरीने गळा आवळून खून झाला. बालवीर पवार असं मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास किरकोळ वादातून वसतिगृहात सोबत राहणार्‍या 8 वर्षीय आणि 13 वर्षीय दोन दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी या 8 वर्षीय विद्यार्थी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे. दोघांनी या हत्येची कबुली दिल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

दरम्यान, खेळताना झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिस अधीक तपास करत आहेत.

भोकरदन येथील या अल्पवयीन हत्याप्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून चिमुकल्या मुलाचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.