फक्त तीन हजारमध्ये वर्षभर टोलमुक्त प्रवास ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा : 15 ऑगस्टपासून फास्ट स्टॅग योजनेला प्रारंभ

नवी दिल्ली

केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे फास्ट स्टॅग बद्धलची घोषणा केली. वाहनचालकांसाठी लवकरच फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू होणार आहे. या नव्या योजनेंतर्गत वाहनधारकांना 3 हजार रुपयात वर्षभर (200 ट्रीप) टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. आगामी 15 ऑगस्ट 2025 पासून ही योजना लागू होईल.

श्री. गडकरींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार आगामी 15 ऑगस्टपासून सुरू होणारी ही पास केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 फेऱ्या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील. वार्षिक पासमुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून सहज आणि किफायतशीर प्रवास करता येईल, असे गडकरींनी म्हटले आहे.

नवीन धोरण

नवीन धोरण 60 किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्यांसंदर्भातील जुन्या समस्यांचे निराकरण करते आणि एकाच, परवडणाऱ्या व्यवहाराद्वारे टोल भरणे सुलभ करते. टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहन मालकांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे, हा या वार्षिक पासचा उद्देश असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. इच्छुकांना ‘राजमार्ग यात्रा’ या अधिकृत ॲपद्वारे हा पास ॲक्टिवेट करू शकतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.