जनतेच्या अपेक्षांची पूर्ती लवकरच होणार : भुसावळात मंत्री रक्षा खडसे –

भुसावळ – राज्यात बहुमतात भाजपा-महायुतीचे सरकार निवडून आले असून सरकारचा शपथविधीही झाला आहे व लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे. महायुतीने यापूर्वी केलेली विकासकामे जनतेला भावली असून निवडणूक काळात दिलेल्या प्रत्येक आश्वासनांची लवकरच पूर्ती होईल, असा आशावाद क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी येथे व्यक्त केला. शहरातील संतोषी माता सभागृहात मंत्री पदी निवड झाल्यानंतर त्यांचा समाजबांधवांतर्फे सत्कार करण्यात आल्यानंतर ‘त्या’ माध्यमांशी बोलत होत्या.
महायुती सरकारने यापूर्वी अनेक विकासकामे केली व ती जनतेपर्यंत पोहोचल्याने जनतेने पुन्हा महायुतीला कौल दिल्याने राज्यात भाजपा-महायुतीचे सरकार सत्तेत आल्याचे मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती होणार असून जनतेचा कौल हा महायुतीकडेच असल्याचे त्यांनी सांगत विरोधी पक्षाकडे 50 वर आमदार नसून विरोधकांकडे विरोधी पक्ष नेताही नाही सांगितले.
लोकसभेत जादा जागा निवडून आल्याने त्यावेळी विरोधकांनी आरोप केले नाही मात्र विधानसभेत दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी आता ईव्हीएमला दोष देणे सुरू केले आहे. ही विरोधकांची परंपरा असल्याचे मंत्री खडसे म्हणाल्या. आम्ही लोकसभेचा निकाल मान्य केला मात्र आम्ही ईव्हीएमवर टीका केली नाही, असेही त्या म्हणाल्या. सर्वत्र बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी होत आहे या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, आधीच्या काळात बॅलेट पेपर निवडणुका होत होत्या कारण तेव्हा लोकसंख्या मर्यादीत होती मात्र त्या तुलनेत लोकसंख्येचा विस्तार वाढला असून तेव्हढी यंत्रणा गरजेची आहे.

आमदार खडसेंच्या भाजपा प्रवेशासह अजित पवारांना मिळालेल्या क्लीन चीटबाबत त्यांनी भाष्य टाळत संबंधितांनाच विचारा, असे सांगून उत्तर देणे टाळले.