पाणलोट क्षेत्रात पाऊस , हतनूर धरणाचे दोन दरवाजे उघडले – यंदाच्या पावसाळ्यात 22 दिवसांआधीच विसर्ग

भुसावळ : जळगाव जिल्ह्याला संजीवनी ठरलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसानंतर धरणात सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने शनिवारी रात्री धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. धरणातून प्रती सेकंद 62.8 क्युमेक्स अर्थात 2218 क्युसेस वेगाने विसर्ग सुरू आहे. गतवर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे धरणातून मे महिन्यातच विसर्ग झाला तर मान्सून हंगामात पाऊस लांबल्याने 5 जूलै रोजी विसर्ग करण्यात आला मात्र यंदा 22 दिवस आधीच विसर्गाला सुरूवात झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे शुक्रवारी रात्रीपासून धरणात आवक वाढली तर शनिवारी रात्री आवकचे प्रमाण अधिक झाल्याने रविवारी सकाळी आठ वाजता धरणातून पहिला विसर्ग करण्यात आला. दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडून नदीपात्रात 62.8 क्युमेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले.
हतनूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे तापी नदी खळाळून वाहू लागली आहे. तापीचे पात्र कोरडे झाल्यानंतर प्रथमच त्यात हतनूर धरणातून पहिला विसर्ग करण्यात आल्याने तापीला आलेला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर पाहण्यासाठी पुल, इंजिनघाट, महादेव घाट, राहूल नगर घाट आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. हतनूर धरणात रविवारी सकाळी आठ वाजता 210.640 मीटर जलपातळी होती तर 219.60 दलघमी जलसाठा असून 56.60 टक्के जलसाठा आहे.