भुसावळ : शहरातील अतिरीक्त जिल्हा न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत न्यायालयातील दाखल खटले आणि दाखलपूर्व खटले असे 157 खटले निकाली निघाले. त्यापोटी एक कोटी 32 लाख 24 हजार 445 रूपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. लोक अदालतीमध्ये 4 हजार 250 आणि कोर्टातील 2 हजार 218 खटले ठेवण्यात आले होते. त्यातून 157 खटले निकाली निघाले.

तीन पॅनलद्वारे नियोजन
भुसावळ न्यायालयात एकूण तीन पॅनेलव्दारे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. पहिल्या पॅनलचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश- 1 व्ही.सी.बरडे होते. पंच म्हणून अॅड.अर्पणा काटकर होत्या. दुसर्या पॅनेलचे प्रमुख न्या.हेमा पाटील होत्या. पंच म्हणून अॅड.दर्शन लोखंडे होते तसेच तिसर्या पॅनेलचे प्रमुख न्या.के.एन.पत्रे होते,. त्यांच्यासोबत पंच म्हणून अॅड.निता पाटील होत्या. अनेक वकीलवृंद व पक्षकार यांचा स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवला.
लोक अदालतीत ग्रामपंचायत, वीज कंपनी, भारत संचार निगम, बॅकांचे खटले होते. यात बँकेचे 34 खटले निकाली निघाले. वकील संघाचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील व सर्व पदाधिकारी, वकील यांनी लोकन्यायालय यशस्वीतेसाठी हातभार लावला. न्यायालयीन कर्मचारी सतीश पाटील, के.बी.जावळे यावेळी सहकार्य केले.


