भुसावळ पालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ : कचर्‍यातून निर्मित सेंद्रीय खताला महासिटी कंपोस्ट हरीत ब्रँड –

भुसावळ : भुसावळ पालिकेने गेल्या वर्षभरापूर्वी ठेकेदाराच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प सुरू केल्यानंतर त्यातून वर्षभरात 150 टन सेंद्रीय खत निर्मिती करण्यात आली होती. प्रकल्पातील सेंद्रीय खताला स्वच्छ महाराष्ट्र अभियान विभागाने हरीत महासिटी कंपोस्ट खत या नावाने ब्रँडला मंजूरी दिल्यानंतर पालिकेला आता खताची विपणण व विक्री करता येणार असल्याने पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

पालिकेला विपणनासह विक्रीची परवानगी
पालिकेने जानेवारी 2022 पासून शहरात ठेकेदार पी.एच.जाधव या एजन्सीच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन प्रक्रल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून मे महिन्यापासून ओला कचरा वेगळा करुन सेंद्रीय खताची निर्मिती केली जात आहे. पालिकेला या खताच्या निर्मितीतून उत्पन्नही मिळाले आहे. दरम्यान पालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियान विभागाकडे कचर्‍यापासून निर्मिती सेंद्रीय खताला हरीत-महासिटी कंपोस्ट नावाने ब्रँड मिळण्यासाठी मागणी केली होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी वभागाचे राज्य अभियान संचालक अनिरुध्द जेवळीकर यांनी याबाबत हा ब्रँड प्रदान करण्याचे प्रमाणपत्र पालिकेला दिले आहे. यामुळे आता शहरातून निघणार्‍या कचर्‍यापासून निर्मित सेंद्रीय खत पालिका प्रशासन हरीत महासिटी ब्रँड या नावाने विपणन व विक्री करू शकणार आहे.

खताच्या पिशवीवर ब्रँडचा लोगो गरजेचा
पालिकेला केवळ विघटनशील कचर्‍यापासून खत निर्मिती करता येईल. निर्मिती खताची किमान दर तीन महिन्यांतून एकदा राज्य शासनासने प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळांमार्फत परिक्षण करुन त्या परिक्षणाचा अहवाल स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयाकडे सादर करावा लागेल. या परीक्षणात खताची भौतीक लक्षणे, रासायनिक घ्टक व जडधातूंचे अस्तित्व तपासणी केली जाईल. खताच्या पिशवीवर सदर ब्रँडचा लोगो छापणे आवश्यक राहणार आहे.

वर्षभराच्या मेहनतीचे फलित
कचर्‍यातून निर्मित सेंद्रीय कंपोस्ट खताला आता हरीत महासिटी कंपोस्टचा ब्रँड मिळाला आहे, ही समाधानाची बाब आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही या प्रकल्पावर मेहनत घेत आहोत. यातून पालिकेला उत्पन्न तर मिळेलच पण शेतकर्‍यांना उत्कृष्ठ प्रतीचे सेंद्रीय खत उपलब्ध होईल, असे मुख्याधिकारी
संदीप चिद्रवार म्हणाले.