वरणगाव येथील शिवभोजन थाळी केंद्रातून एकाच महिन्यात 3750 गरजूनी घेतला लाभ ; लॉकडाऊनमध्ये शिवभोजन सुरु झाल्याने गरिबांना मिळतोय दिलासा ;


वरणगाव –
येथे बस स्टॅन्ड चौकात मे महिन्यात सुरु झालेल्या शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून पहिल्याच महिन्यात 3750 गरीब व गरजूनी एकाच महिन्यात शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. लॉकडाऊनच्या अतिशय कठीण काळात हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांसाठी वरणगावातील या शिवभोजन केंद्रातून मोठा दिलासा मिळत आहे.

महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी वरणगावात महाराष्ट्र शासनाचा गरीब व गरजूसाठी उपक्रम असलेला शिवभोजन थाळी केंद्राचे उदघाटन झाले होते. मे च्या पहिल्या महिन्यातच या शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून वरणगाव व परिसरातील गोरगरीब कष्टकरी आणि हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांसाठी हे शिवभोजन थाळी केंद्र मोठा दिलासादायक ठरत आहे.
दररोज बस स्टॅन्ड चौकात, हॉटेल अमृततुल्य येथे दुपारी 12 ते 2 या वेळेत शिवभोजन थाळी केंद्रावर लांब रांग लागते. यामध्ये स्त्री, पुरुष, मुले, मुली, जेष्ठ नागरिक असे 125 गरीब व गरजूना शिवभोजन थाळीचे वाटप केले जाते. लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणू संसर्गमुळे सध्या शासनाकडून घोषणा करण्यात आल्यामुळे गरिब व गरजूना शिवभोजन थाळी मोफत आणि पार्सल सुविधामध्ये देण्यात येत असल्याची माहिती शिवभोजन केंद्र संचालक संतोष माळी यांनी सांगितले .

थाळी वाढविण्यात यावी –

वरणगावसाठी शिवभोजन थाळी केंद्रावर शासनाकडून फक्त 100 थाळीला परवानगी दिली आहे. तरी आम्ही दररोज 125 थाळी वाटप करतो. शहराची लोकसंख्या 50 हजाराच्या जवळपास आहे. हि लोकसंख्या लक्षात घेता थाळी संख्या जास्त वाढवून मिळावी, अशीही मागणी केंद्र संचालक आणि लाभार्थी यांच्याकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *