भुसावळ (प्रतिनिधी )-
वाढत्या वीज बिलांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वीज बिले वाढीव येत असून वीज ग्राहक हैराण झाले आहेत. परिणामी यावर एक छोटा उपाय म्हणून आता वीज बिल तक्रारदारांशी थेट संवाद साधला गेला पाहिजे म्हणून शिवसेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्रा.विनोद गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, नबी पटेल, फिरोज तडवी, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांना भुसावळात पीसीनुसार समाधान शिबिराचे आयोजन करावे अश्या मागणीचे निवेदन दिले आहे.
शिवसेना लोकांशी थेट संवाद ठेवणार:
गेली अनेक दिवस शिवसैनिक वाढीव वीज बिल विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन उभे करत आहे. हजारो रुपयांची अनेक ग्राहकांची देयके दुरुस्त करण्यात यश मिळवले. नुकतेच वीज बिल केंद्रावर प्रा.धिरज पाटील, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्रा.विनोद गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील यांनी लोकांशी थेट संवाद साधला. अनेक वृद्ध नागरिक या रांगेत तक्रार घेऊन उभे होते. जिथे महिन्याला पाचशे रुपये बिल येत होते. तिथे महिन्याला १५०० ते २००० रुपये वीज बिल आले आहे. त्यात १ एप्रिल २०२० पासून महावितरणने वीज बिलात वाढ केलेली आहे. शिवसेना लोकांशी थेट संवाद सप्ताह हा उपक्रम सुरू ठेवणार आहे. या अंतर्गत दररोज वेगवेगळ्या वीज बिल केंद्रांवर जाऊन लोकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेणार असल्याची माहिती संघटक प्रा.धिरज पाटील यांनी दिली.
शिबिरातून ग्राहकांना दिलासा मिळणार:
लॉकडाउनमुळे होरपळलेल्या सामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक महावितरणने दिलेला आहे. समाधान शिबिरातून वाढीव विजबिलांबाबत आता नागरिकांना तक्रार करता येईल. भुसावळ शहरातील वीज ग्राहकाला दिलासा देण्याचा उद्देश्य या शिबिरातून साध्य होईल असे शिवसैनिकांचे म्हणणे होते.



