वरणगांव ( प्रतिनिधी )- वरणगाव ग्रामपंचयतीच्या कार्यकाळात नगदी चलन भरून घेतलेली घर बांधकामाची परवानगी व मंजूर असलेल्या नकाशाची प्रत मागणीसाठी नगर परिषदेकडे वारंवार अर्ज व माहितीचा अर्ज केलेल्या अर्जदारास दस्तावेज अद्यापही उपलब्ध न झाल्याच्या कारणावरून नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात त्रस्त झालेले अमोल पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे शहरातील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात स . न . २००८ मध्ये नारी मळा येथील रहिवाशी अमोल रामदास पाटील यांनी आपल्या आईच्या नावे जयंताबाई रामदास पाटील यांच्या मालकीचे गट न. ५२ / १ / ३ मधील प्लॉट न .३० मध्ये दि २२ / १० / २००८ रोजीच्या ग्रामपंचचतीच्या झालेल्या बैठकीत घर बाधकांम परवानगी व मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते . त्यानुसार त्यांना मंजुरी देखील देण्यात आल्याने रितसर नगदी चलन भरून त्याची परवानगी घेऊन बांधकाम पुर्ण केले . मात्र, त्याच बांधकामाचे नगर परिषदेकडे ग्रामपंचायत कार्यकाळातील मंजुर झालेला नकाशा व परवानगीची नक्कल मागण्यासाठी अमोल रामदास पाटील यांनी अर्ज केला होता . मात्र, दस्तावेज देण्यास सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली . यामुळे पाटील यांनी माहिती अधिकारात शेवटी नगर परिषदेकडे माहिती मागवली असता ग्रामपंचायतीच्या कार्यकाळातील दस्तावेज उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करून पुन्हा नगदी चलन भरून टाकल्यानंतरच तुम्हाला बांधकाम परवानगी व नकाशा देऊ असे सांगण्यात आले . यामुळे अमोल पाटील यांनी दि . १ रोजी नगर परिषद कार्यालयासमोर रितसर उपोषणाला सुरुवात केली . यावेळी नगराध्यक्ष सुनिल काळे व मुख्याधिकारी राहुल भोये यांनी उपोषणस्थळी पाटील यांची भेट घेऊ ग्रामपंचायतीचे दप्तर उपलब्ध नसल्याने आपण परवानगी साठी नवीन अर्ज करण्याचा सल्ला दिला . मात्र, शहरातील निम्यापेक्षा जास्त बांधकामाच्या परवानग्या ह्या ग्रामपंचयातीच्या कार्यकाळातील असुन त्याचे दप्तर गहाळ झाले असेल तर त्याची पोलीसात तक्रार का दिली गेली नाही असा प्रश्न उपोषणकर्ते अमोल पाटील यांनी उपस्थित केला आहे . यावेळी नगरसेवक निलेश चौधरी , इरफान सय्यद , राजेंद्र चौधरी , चंद्रकांत बढे , मनोज देशमुख , दिपक मराठे अशपाक काझी , मनोज अग्रवाल , गणेश देशमुख , कुलदिप देशमुख यांनी उपोषणाला पाठींबा दिला आहे . झारीतील शुक्राचार्य कोण ? वरणगांव शहराचा दिवसेंदिवस वाढत असून अनेकांनी प्लॉट खरेदी करून बांधकाम केले आहे . यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यकाळा पासुन परवानगी मागितली आहे . मात्र, तत्कालीन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी संबंधीताकडून काही प्रमाणात रक्कम घेवून त्यांना अद्याप पर्यंत बांधकामांची परवानगी का? देण्यात आली नाही . असा आरोप होत असुन या सर्व प्रकरणातील झारीचे शुक्राचार्य कोण ? असा प्रश्न शहरवासीयांमध्ये निर्माण झाला असून याबाबत शासनाने कठोर कारवाईची पावले उचलण्याची मागणी होत आहे .


