भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे अतिक्रमण धारकांनी पालिका प्रशासकिय कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले असून शुक्रवार, 15 रोजी आंदोलनाला चार दिवस पूर्ण झाले. मागण्या मान्य होईस्तोवर आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेत स्वातंत्र्यदिन साजरा करीत आंदोलन केले

पाच हजार घरे जमीनदोस्त
रेल्वे विभागाने गेल्या सात वर्षांपूर्वी विकासकामांच्या नावाखाली पाच हजार घरे जमीनदोस्त केली. 1सात वर्ष उलटूनही हा प्रश्न सुटत नसल्याने अतिक्रमणधारकांनी मंगळवारपासून पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी आंदोलनाला भेट देवून चर्चा केली मात्र हा प्रश्न आता ंसबंधीत सध्या तापी काठावर सर्वे नंबर 63/1 या जागेचे आरक्षण उठविण्यासाठी मंत्रालयात असल्याचे सांगितले. यामुळे आता हा प्रश्न वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हेच सोडवू शकतात. त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे, यामुळे त्यांनी चर्चेसाठी येवून हा प्रश्न सोडवावा, असे मत आंदोलकांतर्फे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी मांडले आहे.
आंदोलनस्थळी देशभक्तीपर कार्यक्रम
देशाचा स्वातंत्र्य दिवस असून देशाचा सर्वोच्च उत्सव आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमत: भारतीय ही शिकवण समस्त देशाला दिली असल्याने आम्ही सर्व आंदोलन करते भारतीय नागरिक असल्याने आंदोलनस्थळी स्वातंत्र्य दिवस साजरा करून बेमुदत ठिय्या आंदोलन कायम करणार आहोत. आंदोलनकर्त्यांच्या वतीने देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन आंदोलन स्थळी करण्यात आले .
प्रसंगी लोकप्रतिनिधींच्या घरावर बिर्हाड मोर्चा
116 ऑगस्टपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सात वर्षांपूर्वी बेघर झालेल्या अतिक्रमणधारकांना अद्यापही निवारा मिळालेला नाही, हक्काचा निवारा मिळावा म्हणून आजही रस्त्यावर येऊन प्रशासनाला पुनर्वसन करा म्हणून आंदोलन करावे लागण्याची बाब दुर्दैवी आहे. 16 ऑगस्टपासून रेल्वे अतिक्रमणधारकांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घरावर, कार्यालयांवर बिढार मोर्चा काढण्याचा तसेच रस्त्यावर घेराव घालण्याच इशारा वंचित आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी दिला आहे.


