अल्पवयीन वाहनधारक वाहतूक शाखेच्या रडारवर, महिन्याभरात 100 जणांवर कारवाई –

जळगाव : शहरात वाहन परवाना नसलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वाहने चालविल्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार सोमवार ६ रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत १०० वाहने जळगाव शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आली, तसेच दुपारी दोन वाजेपर्यंत एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या महिन्याभरात थकित असलेल्या दंडाच्या २५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली.

परिवहन विभागानुसार, १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना मिळतो. तथापि, काही पालक अल्पवयीन विद्यार्थ्यांना वेळेची बचत करण्यासाठी आणि क्लासेस किंवा कॉलेजला जाण्यासाठी वाहने चालवण्याची परवानगी देतात, ज्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. तसेच विद्यार्थी बेशिस्तपणे वाहने चालवित अपघाताला निमंत्रण देत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे .

यामुळे विद्यार्थ्यांचे वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात आली. यात २५ नोव्हेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये थकीत असलेल्या दंड रकमेपैकी २५ लाख वसूल करण्यात आले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, अनेक वेळा विद्यार्थी वाहन चालवताना वेग मर्यादा पाळत नाहीत, तसेच ट्रिपल सीटवर वाहन चालवले जातात. यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. भविष्यात ही समस्या कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये याकरिता ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले.