भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे स्थानक व बसस्टैंड परिसरातील निराधार, मनोरुग्ण व भिकाऱ्यांना शहरातील सेवाभावी संस्थांनी अन्न व पाण्याची व्यवस्था केली. दुकाने बंद असल्याने तहानभुकेने व्याकुळ झालेल्या भिकारी व मनोरुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. कोरोनाच्या दहशतीच्या काळातही शहरातील सेवाभाव मात्र कायम असल्याचे दिसून आले. रविवारी जनता कर्फ्युमुळे बंद होते, यामुळे स्थानक व बसस्टँडवर असलेले शेकडो भिकारी, निराधार,दिव्यांग, मनोरुग्ण भिकाऱ्यांना बाहेर काढले. शहरातील मॉर्डनरोड व स्टेशन रोडवरील बंद असलेल्या दुकानांच्या ओट्यावर या निराधारांनी आपला डेरा जमवला. मात्र दुकाने बंद असल्याने त्यांना नेहमीप्रमाणे अन्न, पाणी मिळाले नाही. भुकेने व्याकुळ झालेल्या त्यांच्यासाठी सिंधी कॉलनीतील स्वामी प्रेमदास बाबा तनुराम थल्ला दरबार,अमृतवेला परिवाराचे सदस्य देवदूत म्हणूनच समोर आले. चारचाकी गाडीतून पॅकेजींगचे खाद्य पदार्थ, मिठाई, खिचडी आदी वस्तूंचे तब्बल सव्वाशे पेक्षा अधिक पाकिटे गरजूंना वाटली. तर शहरातील सेवाभावी व्यक्तींनी पाण्याच्या सिलबंद बाटल्यांचे वितरण केले.
सकाळपासून दुकाने बंद असल्याने तसेच रस्त्यांवर कोणीही फिरकत
नसल्याने भुकेने व्याकूळ झालेल्या निराधारांना दिलासा मिळाला.



