जळगाव : गुजरात येथील व्यापारी भुसावळ येथे व्यापार करण्यासाठी जात असताना जळगाव येथील दादावाडी या ठिकाणी अज्ञात तीन जणांनी गाडीमधील एक लाख वीस हजाराची बॅग घेऊन पळ काढला. ही घटना सोमवारी सकाळी 10.30 वाजता घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी पाठलाग करून दोन तासांमध्ये तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. जितेंद्र रामलाल चव्हाण (32, टाहकळी, ता.मुक्ताईनगर), राजेंद्र मधुकर जाधव (31), बंडू जेता राठोड (28, मुराझिरा, मुक्ताईनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सुरतचे व्यापारी हिराभाई किरीटभाई रावल हे भुसावळ शहरात सोमवारी व्यापारासाठी चारचाकी हुंडाई (जी.जे.01 आर.एल.8188) ने जात असताना जळगावातील दादावाडी येथील पेट्रोल पंपाजवळील आयडीबीआय बँकेच्या एटीएमसमोर थांबले असताना दुचाकीवर तिघे आले व एकाने चक्कर आल्याचे नाटक केले व त्याचवेळी चारचाकीतील रावल यांच्या मुलाचे लक्ष विचलित करीत दुसर्या भामट्यांनी वाहनातील एक लाख वीस हजारांची रोकड असलेली बॅग लांबवली.
व्यापार्याने स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेने आरोपी पसार झालेल्या रस्त्यावरून त्यांचा माग काढण्यास सुरूवात केली. वाहन चालक महेश सूर्यवंशी यांनी आरोपींचा पाठलाग सुरू केल्यानंतर मोंढाळे गावाजवळील कच्च्या रस्त्यावर वाहने सोडून आरोपी मक्याच्या शेतात शिरले व त्याचवेळी पथकाने त्यांच्या मुसक्या बांधल्या. दोन दुचाकींसह एक लाख 20 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, अतुल वंजारी, राजेश मेढे, हरिलाल पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी आदींच्या पथकाने केली.



