नवी दिल्ली, –

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सातारा येथील वाई येथे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातातील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कंटेनरने अचानक ब्रेक लावला, त्यानंतर आठवले यांची कार कंटेनरला धडकली.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कारला साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये अपघात झाला. समोर वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे आठवले यांची कार पुढच्या गाडीवर धडकली. रामदास आठवले हे साताऱ्यातील वाईमधून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी रामदास आठवले यांच्या ताफ्यातील एका कार कंटेनरला धडकली. त्यानंतर ताफ्यातील एका कारने अचानक ब्रेक दाबला. त्यानंतर आठवले यांची कार ही समोरील गाडीला धडकली.
या अपघातात रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांना किरकोळ इजा झाली आहे. या अपघातानंतर खंबाटकी घाटामध्ये ट्रॅफिक जाम झाली आहे. सुदैवाने रामदास आठवले आणि कुटुंब सुखरुप आहेत. यावेळी आठवले यांच्या सासूबाई ही त्यांच्या सोबत होत्या. त्याही सुरक्षित आहेत. या अपघातानंतर रामदास आठवले हे दुसऱ्या कारने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.


