जळगाव : जळगाव ते भादली दरम्यानच्या चवथ्या रेल्वेलाईनची चाचणी मंगळवारी करण्यात आली. या रुळावरुन 110 किलोमिटर प्रतितास या वेगात रेल्वे गाडी चालविण्यात आली. यात कुठलाही दोष आढळला नाही, रेल्वेलाईन निर्दोष असल्याचे संकेत रेल्वे सेफ्टी चेअरमन मनोज आरोरा यांनी दिले. भादली ते जळगाव दरम्यान चवथ्या रेल्वेलाईने काम गेल्या तीन वर्षापासून सुरू होते. हे काम पुर्ण झाल्यामुळे मंगळवारी मुंबई येथील चेअरमन रेल्वे सेफ्टी मनोज आरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे लाईनीची पाहणी करून चाचणी घेण्यात आली.

आवश्यक सूचना केल्या
मंगळवारी सकाळपासून भादली ते जळगाव दरम्यान संपुर्ण रुळाची पाहणी केली. आवश्यक त्या सूचना अरोरा यांनी रेल्वे अधिकार्यांना केल्या. यानंतर सायंकाळी 5.2 वाजता भादली येथून ही गाडी या रुळावरुन सुमारे 110 किलोमिटर प्रतितास वेगाने चालविण्यात आली. या गाडीने 5.10 वाजता म्हणजे अवघ्या आठ मिनिटात 12.62 किमी अंतर पार केले. यानंतर अरोरा यांनी संबधित लाईन निर्दोष असल्याचे स्थानिक अधिकार्यांना सांगितले. म्हणजेच आता लवकरच या लाईनीवरून सुध्दा रेल्वे गाड्या धावू शकणार आहे. पर्यायी रेल्वेरुळ उपलब्ध झाल्यामुळे आता जळगाव ते भादली दरम्यान रुळाचे काम सुरू असताना रेल्वेगाड्यांना विलंब होणार नाही. मंगळवारी सेफ्टी चेअरमन मनोज आरोरा यांच्या सोबत डीआरएम एसएस केडिया, डेप्युटी इंजीनियर पंकज धावरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भुसावळ मार्गावर कामास गती द्यावी
दरम्यान, ही चवथी रेल्वेलाईन जळगाव ते भुसावळ दरम्यान टाकली जात आहे. परंतु भादलीच्या पुढे ओव्हर ब्रीज असल्यामुळे तेथील कामास चालना मिळत नाही, रेल्वे प्रशासनाकडून या ब्रीज व अन्य मार्गावरील काम अत्यंत संतगतीने सुरू असल्याने या कामाला गती देण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे गेटबाबत अधिकार्यांना निवेदन
जळगाव ते भादली दरम्यानच्या या कामासाठी अनेक महिन्यांपासून भादली स्थानकाजवळील रेल्वेगेट बंद केले आहे. यापुढे ते गेट सुरू होणार नाही. परीणामी परिसरातील नागरीकांना रेल्वेरुळ ओलांडणे अशक्य झाले आहे. रेल्वे विभागाने या गेटच्या ठिकाणी नागरीकांसाठी अंडरपासची मागणी केली. या भागातील ग्रामस्थांनी भादली स्थानकावरच अधिकार्यांना गाठत आपले गार्हाणे मांडले. यावेळी मनोज अरोरा यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले.


