भुसावळ (प्रतिनिधी )-
शेती, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जमीन मोजणी याशिवाय खरेदी-विक्री झालेल्या मालमत्तेचे फेरफार करण्यासाठी, नकाशा, उतारा, आखीव पत्रिका इत्यादी कागदपत्रे तसेच मोजणीसाठी व इतर प्रकरणासाठी भूमीअभिलेख कार्यालयात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यावसायिक मोजणी शुल्क भरतात. परंतु ही कामे ठराविक कालावधीमध्ये पूर्ण होत नाही. भुसावळ उपविभागीय अधिकारी यांनी त्वरित या समस्येवर तोडगा काढवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल तर्फे शहराध्यक्ष निलेश कोलते यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात राहुल नाईक यांना निवेदन देतांना दिला. यावेळी विवेक चौधरी, शेख वाजीद, हेमंत इंगळे, विशाल सुरवाडे, बबलू कोचुरे, अक्षय पाटील उपस्थित होते.
सर्वसामान्यांना मानसिक त्रास;
भूमीअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत ? कारण अधिकारीसुद्धा नियमित येत नाहीत अश्या नागरिकांच्या तक्रारी आहेत आणि याचा फटका नागरिकांना बसत असून रखडलेल्या प्रकरणांचा ताण वाढला आहे. या कार्यालयात अधिकारी नियमित उपस्थित राहत नसल्याने सर्वसामान्यांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे असे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रात भूमीअभिलेख विभाग अद्ययावत व डिजीटलायजेशनकडे वाटचाल करण्याच्या तयारीत असताना भुसावळ येथील कार्यालयात मात्र मोजणी, फेरफारसह शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याने सामान्य नागरिकांची फरपट सुरू आहे. या सर्व प्रणाली नियमित वेळेत पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांना होणारा त्रास थांबला पाहिजे ही नागरिकांची अपेक्षा आहे, असे निलेश कोलते म्हणाले.



