भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नेपानगर स्थानकाजवळील संजय नगर परिसरात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत तिसरी व चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ८२५० चौरस मीटर रेल्वे जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. या कारवाईमुळे प्रकल्पाच्या कामांना अधिक गती मिळणार असून रेल्वेच्या क्षमता वृद्धीच्या उद्दिष्टाला चालना मिळणार आहे. भुसावळ विभागाने सुरू असलेल्या तिसरी/चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या संरेखनात अडथळा निर्माण करणारी अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी ही मोहीम हाती घेतली होती. मोहिमेदरम्यान एकूण ६० अनधिकृत संरचना हटविण्यात आल्या. तसेच कि.मी. ५२३/९१८ ते कि.मी. ५२४/२५० दरम्यान सुमारे ३३० मीटर लांबीचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला. २५ मीटर रुंदीच्या या पट्ट्यातील एकूण ८२५० चौरस मीटर रेल्वे जमीन पुन्हा रेल्वेच्या ताब्यात घेण्यात आली. हटविण्यात आलेली अतिक्रमणे तिसरी व चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी अधिग्रहित आणि चिन्हांकित करण्यात आलेल्या रेल्वे जमिनीवर होती. ही मोहीम भुसावळ विभागातील अभियांत्रिकी व वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF), राजकीय रेल्वे पोलीस (GRP) तसेच स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या या जागेवर आता रेल्वेमार्ग अंथरणे आणि प्रकल्पाशी संबंधित इतर पायाभूत सुविधा उभारणीची कामे वेगाने सुरू करता येणार आहेत. त्यामुळे तिसरी-चौथी रेल्वेमार्ग प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. रेल्वेच्या सुरक्षित आणि कार्यक्षम संचालनासाठी तसेच जनहिताच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेत पूर्तता करण्यासाठी रेल्वे जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम भविष्यातही सुरू राहणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.


