भुसावळ (प्रतिनिधी ) : नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद पाहता या गाडीला नव्याने आठ अतिरीक्त डबे जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडून मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी जर या गाडीला आठ अतिरीक्त डबे जोडल्यास प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.

तर प्रवाशांची होणार सोय
नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आठ डबे घेऊन धावत आहे. या गाडीला पहिल्या दिवसांपासून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या गाडीचे आरक्षण महिनाभर अगोदरच प्रवासी करून ठेवत असल्याने अनेकदा या गाडीचे तिकीट उपलब्ध होत नाही. आता दिवाळीच्या काळात या गाडीला नोरूम दाखवत असल्याने प्रवाशांना पुणे जाण्यासाठी मोठीच अडचण सहन करावी लागत आहे. या गाडीने जाण्यासाठी प्रवाशांचे प्रयत्न असतात मात्र तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांचा नाईलाज होत आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून या गाडीला अजून 8 अतिरीक्त डबे जोडल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होईल, असा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला वरिष्ठांकडून मंजूरी मिळाल्यास या गाडीला आठ डबे जोडले जातील व प्रवाशांची गैरसोय दूर होईल.


