ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचे अपघाती निधन : स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने मध्यरात्री अपघात:

संतोष बळीद हे नाशिक येथे विवाह समारंभ आटोपून लासलगाव मार्गे मनमाडला जात असताना वाहेगावसाळ शिवारात त्यांच्या कारचा अपघात झाला. रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होत शेतात जाऊन आदळली. या भीषण अपघातात संतोष बळीद यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले सहकारी गंभीर जखमी झाले.

या दुर्दैवी घटनेमुळे मनमाड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष बळीद यांच्या निधनाने एक लढवय्या शिवसैनिक गामावल्याची भावना मनमाड शहरातील लोक व्यक्त करत आहे. तसेच संतोष बळीद यांचे सर्व पक्षातील नेत्यांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. संतोष बळीद यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

संतोष बळीद हे गेल्या 30 ते 35 वर्षापासून शिवसेनेत कार्यरत होते. तर त्यांनी अनेक जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून त्या प्रश्नांना वाचा फोडली होती. तर शिवसेना फुटीनंतर सुद्धा ते उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. शिवसेना शहर प्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी चोख पद्धतीने पार पाडली असे स्थानिक कार्यकर्ते सांगतात तसेच त्यांनी कठीण परिस्थितीत पक्षाची बांधणी केली होती. कट्टर बाळसाहेबांचे शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. संतोष बळीद हे वीजग्राहक संघटनेच्या माध्यमातून सामान्य जनतेशी जोडले गेले होते. शेकडो आंदोलने, प्रसंगी अंगावर गुन्हे नोंदवून घेत त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले. संतोष बळीद हे माजी आमदार राजेंद्र देखमुखांचे स्वीय सहाय्यक देखील होते.

मानमाड शहरातील नागरिक, विशेषतः माता-भगिनी, अनेकदा वीजबिलांशी संबंधित तक्रारी घेऊन संतोष बळीद यांचेकडे यायच्या. सर्वांसोबत अतिशय नम्रपणे संवाद साधणारे संतोष बळीद अन्यायाविरुद्ध लढताना मात्र सरकारी अधिकाऱ्यांसमोर आक्रमक भूमिका घेत असत. नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेकदा संघर्ष केला आणि त्यासाठी गुन्हेही स्वेच्छेने स्वीकारले. अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्यांसाठी, नागरिकांसाठी कुठल्याही वेळी, अगदी अर्ध्या रात्रीही धावून जाणारा, प्रामाणिकपणा आणि साधेपणा जपणारा खरा नेता आज हरपल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.