मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र धरणार ग्राह्य -मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक विभागाचा निर्णय :

भुसावळ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त मतदारांना ओळख पटवण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात येते. ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नसल्यास अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त नमूद कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करु शकतील, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.
मतदानाच्या वेळी मतदार ओळखपत्र नसल्यास संबंधित मतदाराला या 12 पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचार्‍यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकालांगता प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक यंत्रणेतर्फे केले आहे.