वाघुर धरणाचे दोन दरवाजे उघडले १७० क्यूसेक पाण्याचा नदीत विसर्ग


भुसावळ- तालुक्यातील वाघुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरण १०० टक्के भरल्यामुळे १८ रोजी सायंकाळी धरणाचे दोन गेट उघडण्यात आले असून वाघुर नदी पात्रात १७० क्यू.सेक. पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
वाघुर धरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ७ रोजी झालेल्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. त्यानंतर अद्यापही धरणाच्या पाणी पातळीत वाढ सुरुच असल्यामुळे धरणाचे १८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास धरणाचे दोन दरवाजे ०.०२५ मीटरने उघडण्यात आल्याने वाघुर नदी पात्रात १७० क्यू. सेक.पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची पाणी पातळी २३४.१०० मीटर (१०० टक्के) इतका आहे. पाणीसाठा ३२५.२८७ दलघमी इतका साठा उपलब्ध आहे. वाघुर नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे, नागरिक व मासेमार्‍यांनी नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.