पंचनामा न करता राज्याने सरसकट भरपाई द्यावी -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस –


मुक्ताईनगर –
अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला असून सरकारने पंचनाम्यांच्या सोपस्कारा ऐवजी आता थेट शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुक्ताईनगर दौर्‍यातील दौर्‍याप्रसंगी केली.
मंगळवारी फडणवीस हे जिल्हा दौर्‍यावर केळी नुकसानीच्या पाहणीसाठी दाखल झाले आहेत.
तालुक्यात नुकसानीची केली पाहणी
मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे, नायगाव, पिंप्रानांदू, मेंढोळदे, उचंदा आदी गाव परीसरात अवकाळी वादळी पावसाने केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर फडवणीस यांनी पाहणी करीत शेतकर्‍यांना धीर दिला. ते म्हणाले की, आता सरकारने पंचनाम्यांऐवजी थेट शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, यासाठी आम्ही आग्रही राहू. यावेळी कर्की ग्रामपंचायतींने विविध मागण्यांबाबत फडवणीस यांना निवेदन दिले.
फडवणीस आज जिल्हा दौर्‍यावर
मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत.
स्व.हरीभाऊ जावळे समितीचे निकष कायम ठेवावेत
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुक्ताईनगर तालुक्यात शंभर टक्के केळी बागाचं नुकसान झालेलं आहे. मी शेतकर्‍यांशी चर्चा केली तेव्हा त्यांची अशी अपेक्षा आहे की, एकतर विमा कंपनीने सरसकट त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे कारण, विमा कंपनी विविध मुद्दे उपस्थित करून अडचणी निर्माण करत आहे. सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली पाहिजे. ज्या शेतकर्‍यांचा विमा नाही त्यांना देखील सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी ज्यांचा विमा नव्हता त्यांनाही 50 टक्के रक्कम विमा काढला, असं समजून त्या काळात दिली होती. आता विम्याची रक्कम मिळताना अडचण होत आहे. मागील काळात तत्कालीन आमदार हरिभाऊ जावळे यांची एक समिती आम्ही तयार केली होती आणि हरीभाऊ जावळे समितीने केळीच्या संदर्भात विम्याचे निकष ठरवून त्यावेळेस आपण तसं टेंडर काढलं होतं आणि त्यावर्षी विमा कंपन्यांनी चांगला पैसा शेतकर्‍यांना दिला. मात्र मागील वर्षी हरीभाऊ जावळे समितीचे सर्व निकष बदलवण्यात आले आणि नव्या निकषाने केळीच्या विम्याचा हा टेंडर काढला गेला. त्यामुळे विमा कंपन्यांचा आता अधिक फायदा होतो आहे. विमा कंपन्या पाहिजे त्या प्रमाणात मदत करत नाहीत. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की, हरीभाऊ जावळे समितीचे जे निकष होते, त्या निकषानुसारच या ठिकाणी केळीचा विमा उतरवला गेला पाहिजे आणि शेतकर्‍याला मदत मिळाली पाहिजे. असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *