भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील अयोध्या नगर जवळ अंडरग्राऊंड बोगद्याची मागणी करण्यात आली असून याबाबत
न्हाईच्या अधिकाऱ्यांशी शुक्रवार रोजी महामार्गावर चर्चा करण्यात आली .
शहरातील अयोध्या नगर, श्रीनगर, भोई नगर, जुना सातारा, मुक्ताई कॉलनी, खळवाडी, रेल दुनिया, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, हुडको कॉलनी, स्वामी विहार, जळगांव रोड परिसरातील शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी व साधारण ३०००० नागरिकांसाठी वरणगाव, जामनेरकडे जाण्यासाठी तसेच जळगावहुन भुसावळात येण्यासाठी कोणतीही ठोस सुविधा नसल्याने दिनांक २० मार्च रोजी परिसरातील मंगला पाटील, शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शंतनू पाथरवट, वर्षा वाडीले, विशाल ठोके, अर्चना चौधरी, सुरेश वैद्य, वैभव वैद्य, कुशल पाटील, किशोर पाटील, लव झाडगे, स्वप्नील चौधरी, साहित्य गोयल, भीमराव पाटील मुकेश कोळी, योगेश वैद्य, महाले सर, व नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जळगाव विभागाचे प्रमुख चंद्रमोहन सिन्हा यांना अयोध्या नगर राष्ट्रीय महामार्ग सहा येथे निवेदन सादर केले.
जामनेर रोड परिसरातील महाविद्यालय व शाळांमध्ये या भागातील हजारो विद्यार्थी शिकतात, त्यांना गैरसोय होणार आहे. तसेच परिसरातील महिला, शेतकरी, जेष्ठ नागरिकांना ये-जा करणे कठीण होईल अशी समस्या मंगला पाटील व नागरिकांनी मांडली आहे.
दीड किलोमीटरचा फेरा त्रासदायक: प्रा.पाटील
रेल्वे ब्रिज ते नवोदय विद्यालय चौफुली दरम्यान कोणत्याही प्रकारची प्रवासी सुविधा नाही, वरील नमूद परिसरात येण्यासाठी दीड किलोमीटरच्या वेढ्याने फिरून यावे लागणार आहे. आधीच पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून दररोज दीड किलोमीटरचा फेरा वाढेल यामुळे नागरिक त्रस्त होतील. तरी याभागात योग्य प्रकारे मेडियन किंवा बोगदा झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल व शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीचे होणार आहे अशी मागणी याप्रसंगी नागरिकांच्या वतीने प्रा.धिरज पाटील यांनी केली. योग्य उपाययोजना केल्या जातील असे चंद्रमोहन सिन्हा यांनी सांगितले तर परिसरातील नागरीकांची मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
पालक मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा करून जनतेची समस्या कायमस्वरूपी दूर करावी यासाठी त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे.



