देशातील पहिली डिजिटल जनगणना -नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन :

भुसावळ (प्रतिनिधी) – भारताच्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे देशातील पहिली ‘डिजिटल जनगणना’ आजपासून सुरू होत आहे. या नव्या उपक्रमामुळे नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन पद्धतीने आपल्या कुटुंबाची माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, ही प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे.

सरकारने सुरू केलेल्या या स्व-गणना सुविधेमुळे नागरिकांना प्रगणकाची वाट न पाहता, आपल्या सोयीच्या वेळेनुसार मोबाईल किंवा संगणकाद्वारे माहिती भरता येणार आहे. नागरिकांनी अधिकृत https://se.census.gov.in संकेतस्थळावर जाऊन मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करायची असून, ओटीपी च्या माध्यमातून लॉगिन करून कुटुंबातील सदस्यांची तसेच घरासंबंधित माहिती

३४ एक अचूकपणे भरायची आहे. यासह प्रश्नांची यादीनुसार विचारलेली भरावयाची आहे. कुटूंबाचा मोबाईल, एकच भाषा तसेच कुटूंब प्रमुखाचे नाव नंतर बदलता येणार नाही, ही माहिती सबमिट केल्यानंतर नागरिकांना ११ अंकी संदर्भ क्रमांक मिळणार असून, पुढे प्रगणक घरी आल्यावर केवळ हा क्रमांक दाखवणे पुरेसे ठरणार आहे.

या डिजिटल प्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. नागरिकांचा वेळ वाचणार असून, माहिती स्वतः भरल्यामुळे अचूकता वाढणार आहे. तसेच वैयक्तिक माहितीची गोपनीयताही अधिक सुरक्षित राहणार आहे.

जनगणना प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. स्व-गणनेसाठी पोर्टल १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत खुले राहणार आहे. त्यानंतर १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ दरम्यान घर सूचीकरणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे.

भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे आणि सहाय्यक जनगणना अधिकारी प्रिती लुटे यांनी पत्रकार परिषदेत नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जनगणना हा राष्ट्रीय विकासाचा कणा आहे. नागरिकांनी दिलेली अचूक माहितीच भविष्यातील पायाभूत सुविधा आणि सरकारी योजनांची दिशा ठरवते. त्यामुळे सर्वांनी स्वयंस्फूर्तीने डिजिटल जनगणना मोहिमेत सहभागी व्हावे. तांत्रिक अडचणींसाठी संकेतस्थळावरील ‘हेल्पडेस्क’ विभागाचा वापर करण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.