भुसावळसह मुक्ताईनगरातील पाच उपद्रवी हद्दपार : प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाने खळबळ –

भुसावळ – निवडणूक काळात शांततेला बाधा ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत पोलीस प्रशासनाने प्रस्ताव सादर केले होते. भुसावळ प्रांताधिकार्‍यांकडे हद्दपारीच्या सुनावणी झाल्यानंतर प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी मुक्ताईनगर येथील दोन तर भुसावळातील तीन अश्या पाच जणांच्या हद्दपारीचे आदेश काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलीस प्रशासनाकडून प्रांताधिकर्‍यांकडे उपद्रवी, गुन्हेगार वृत्तीच्या लोकांचे प्रस्ताव पाठविण्यात आले. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने कायद्याचा आधार घेत हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून पाठविले होते. यावर संबंधितांचे म्हणणे ऐकून घेत प्रांताधिकारी पाटील यांनी हद्दपारीचे आदेश शनिवारी काढले. यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. अजूनही प्रांताधिकार्‍यांकडे हद्दपारीचे प्रस्ताव पडून आहे. त्यावर सुध्दा लवकरच निर्णय होणार आहे. शनिवारी काढण्यात आलेल्या हद्दपारीचे आदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्यांच्याहद्दपारीचे आदेश पारीत झाले आहे, त्यांनी तात्काळ जळगाव जिल्हा सोडून जायचे आहे अथवा पोलिसांनी त्यांना जिल्ह्यातून बाहेर काढायचे आहे. असे आदेशात नमूद केले आहे.
मुक्ताईनगर येथील इब्राहीम उर्फ टिपू टिल्या सत्तार मन्यार (32) यास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले तसेच मुक्ताईनगरातीलच आंबेडकर नगरातील रहिवासी अरविंद विजय बोदडे यालादेखील एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले तसेच भुसावळातील पवन मनोहर चौधरी (33, रा.श्रीरामनगर, भुसावळ) यासदेखील एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. शहरातील अमरनाथ नगरातील रहिवासी जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (25) यालादेखील एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील रहिवासी सागर बबन हुसळे (रा.झेडटीसी नगर, फेकरी) याला सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.