खंडाळ्यात 28 वर्षीय विवाहितेची आत्महत्या – दोघा बालकांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार

भुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथे 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंकतर खळबळ उडाली आहे.
अश्विनी किशोर चौधरी (28, रा.खंडाळा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, विवाहितेची मुले प्रणव (3) व श्रेयस (9) यांना उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू असून श्रेयसची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अश्‍विनी चौधरी या विवाहितेने बुधवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास राहत्या बंगल्यात पंख्याला साडीने गळफास घेतला. मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर ते रडतच बाहेर आल्यानंतर घटनेची उकल झाली तर विवाहितेची मुले प्रणव (3) व श्रेयस (9) हे घराबाहेर येताच उलट्या करीत असल्याने त्यांना गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. या चिमुकल्यांना खाण्यातून विषबाधा झाली की त्यांना खाण्यातून काही विषारी द्रव पदार्थ देण्यात आला? या बाबीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस पाटील रतीलाल चौधरी यांनी विवाहितेच्या पतीसह तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तेथे पडून असलेल्या काही औषधाच्या बाटल्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. मृत अश्विनीचा मृतदेह शववाहिनीद्वारे विच्छेदनासाठी जळगाव येथे दुपारी दोन वाजता हलवण्यात आला. दरम्यान, मृत अश्विनी यांचे पती यांचे यांचे शिक्षण एमबीए झाले असून फायनान्स बँकेत नोकरीस होते मात्र कोरोनात त्यांची नोकरी गेल्याने ते घरीच होते. हल्ली ते शेती आणि दुग्ध व्यवसाय करीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विषबाधा झालेल्या श्रेयसची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.