वरणगावसह आठ नगरपरिषदांमध्ये २० रोजी मतदान : ४४ मतदान केंद्रांवर ३३,६६२ मतदार ,

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वरणगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर, यावल आणि सावदा या नगरपरिषदांमधील एकूण नऊ प्रभागांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीसाठी जिल्हाभरात एकूण ४४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, ९ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क आहे.

असे आहे प्रभागनिहाय मतदान चित्र

वरणगाव नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १०-अ व १०-क येथे मतदान होणार असून, येथे प्रत्येकी सहा मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. पाचोरा नगरपरिषदेत ११-अ व १२-ब, भुसावळ येथे ४-ब व ५-ब, अमळनेर येथे ११-ब, यावल येथे १-अ, तर सावदा नगरपरिषदेत ८-ब प्रभागात मतदान होणार आहे.

३३,६६२ मतदार करणार मतदान या निवडणुकीत एकूण ३३,६६२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १६,९५३ पुरुष मतदार, १६,७०६ महिला मतदार, तर ३ इतर मतदारांचा समावेश आहे. महिला व पुरुष मतदारांचे प्रमाण जवळपास समान असल्याने मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

संवेदनशील मतदान केंद्र नाहीत

जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्रे नाहीत. मात्र, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

परदामेरेौन मतदान केंद्रे

जिल्ह्यात एकूण २३ परदामेरेौन मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, त्याठिकाणी अतिरिक्त दक्षता घेण्यात येणार आहे.

सुरक्षा व देखरेखीसाठी स्वतंत्र पथके

मतदान सुरळीत पार पडावे यासाठी १५ मतदान साहित्य वाहतूक पथके,९ झोनल (क्षेत्रीय) अधिकारी,तसेच ११ सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनासह निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, २० डिसेंबर रोजी होणाऱ्या या मतदानाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक ठरणार आहे. प्रशासनाने नागरिकांना निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.